चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी पावसाचे समाधानकारक प्रमाण झाले असले तरी शेतकऱ्यांचे संकट कमी झालेले नाही.वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत यावर्षी 85 टक्क्यांहून अधिक पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. मात्र, या पावसात अनेकवेळा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमिनीतील पिकांचे नुकसान झाले आहे.
सोयाबीन हे प्रमुख पिक असताना आता या पिकावर येलो मोजेक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. पाने पिवळी पडणे, झाडाची वाढ खुंटणे आणि शेंगा न लागणे यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.पावसामुळे झालेले नुकसान, त्यावर येलो मोजेकचा प्रादुर्भाव आणि सतत वाढलेले उत्पादन खर्च या तिहेरी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.
