स्थानिकांच्या विरोधानंतरही वनविभाग आणि एनटीसीए ने अलिझंजा भागातून चंदा वाघिणीला जेरबंद करत सह्याद्रीकडे तिचा प्रवास केला सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढता मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि वाघांची संख्या मर्यादित करण्यासाठी वनविभागाने आखलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यातील व देशातील इतर व्याघ्र प्रकल्पात वाघ -वाघिणींचे स्थलांतर केले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात नवेगाव जंगलात असलेल्या चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना राज्यातील कोकण- पश्चिम महाराष्ट्राची सीमा असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविण्याचा निर्णय झाला होता. या दोन्ही वाघिणींनी कधीही मानवावर हल्ले केले नसल्याने त्यांना हलवू नये असे स्थानिक गाईड आणि वन्यजीव प्रेमींचे मत होते. त्यांचा या दोघींच्याही स्थलांतराला विरोध आहे. मात्र राज्याचा वनविभाग NTCA आणि ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने अलिझंजा भागातून चंदा वाघिणीला जेरबंद करत 850 किमीचा तिचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे प्रवास सुरू केला आहे.
नव्या व्याघ्र प्रकल्पात जुळवून घेण्यासाठी सक्षम असणे ,वय आणि शारीरिक स्थिती या निकषांवर या दोघींची निवड झाल्याचे समजते. याआधीही देशाच्या अन्य व्याघ्र प्रकल्पात ताडोबा परिघातून वाघ -वाघिणींचे स्थलांतर झाले आहे. मात्र ग्रामस्थावर हल्ले करणारी वाघ -बिबटे यांचे स्थलांतर करणे आवश्यक असताना हल्ले न करणाऱ्या वाघ वाघिणींना हलविले जात असल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये नाराजी आहे.
