चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावर पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी वाहिली आदरांजली
ब्रिटिशांविरुद्ध निकराचा संघर्ष करणारे चंद्रपूरचे आदिवासी वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या हुतात्मा दिनी शहरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर शहरातील कारागृह परिसरातील स्मारकावर पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. शहीद क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश सरकार आणि स्थानिक जमीनदारांनी आदिवासी समाजावर अन्याय, जुलूम आणि करांच्या सक्ती विरोधात मोठा संघर्ष केला.
आदिवासी युवकांना संघटीत करून ‘जंगम दल’ नावाचे संघटन उभारले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाचा प्रभाव संपूर्ण भारतात झाला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातही बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिशांविरुद्ध शस्त्र उचलले. आदिवासी योद्धयांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना आव्हान दिले.
बाण, दगड, लपत्या कारवाई आदी पारंपारिक ज्ञान व कुशल रणनीतीचा उपयोग करून चांदा परिसरातील ब्रिटिश ठाण्यांवर अचानक हल्ले केले व इंग्रज सैन्याला तीन वेळा पराभूत करण्याचा पराक्रम केला. त्याना कपटाने अटक करण्यात आली. 21 ऑक्टोबर 1858 रोजी चंद्रपूर कारागृह परिसरात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ते भारताच्या पहिल्या आदिवासी शहिदांपैकी एक ठरले. वीर शहीद बाबुराव शेडमाके यांचे बलिदान व शौर्य, समाजातील नागरिकांना लढण्याची प्रेरणा देणारे आहे. आजच्या दिवशी त्यांचे याचसाठी जाहीर स्मरण केले जाते.
