मुख्य प्रवाहात परतलेल्या सुमारे 100 पुनर्वसन झालेल्या नागरिकांचे बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाकडे प्रस्थान
गडचिरोलीतील हिंसाचाराचा दीर्घ काळ आता संपुष्टात आला असून, मुख्य प्रवाहात परतणाऱ्या नागरिकांसाठी शांतता, पुनर्वसन आणि विकासाची नवी पहाट झाली आहे. या ऐतिहासिक उपक्रमाचा एक भाग म्हणून मुख्य प्रवाहात परतलेल्या सुमारे 100 पुनर्वसन झालेल्या नागरिकांचा विशेष गट गुरुवारी गडचिरोली पोलीस परिसरातून बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाकडे रवाना झाला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विशेष गटाला रवाना करण्यासाठी आणि सहभागी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस परिसरात अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींसह लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड तसेच लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिपचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या फ्लॅग-ऑफ सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते श्री. भूपती यांची उपस्थिती. त्यांना सोनू उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल या नावानेही ओळखले जाते. एकेकाळी त्यांची गणना भारतातील प्रमुख नक्षलवादी नेत्यांमध्ये केली जात होती. नुकतीच त्यांची गोंडवाना विद्यापीठात ‘ग्रामसभा समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या गटाचे नेतृत्व असिन राजाराम उर्फ अनिल करत आहेत. त्यांनी मुख्य प्रवाहात परतत जीवनाची नवी सुरुवात केली आहे. ते गेल्या जवळपास दोन वर्षांपासून लॉयड्ससोबत कार्यरत आहेत.
आपल्या सहकाऱ्यांना संबोधित करताना सोनू म्हणाले, “विविध संस्था आमच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आम्हालाही मुख्य प्रवाहात परतून लोकांमध्ये काम करत त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी योगदान देत राहायचे आहे. लोकांच्या हितासाठी होत असलेल्या या सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो.”
उल्लेखनीय बाब म्हणजे, 2005 ते 2026 या कालावधीत गडचिरोलीतील 800 हून अधिक नागरिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात पुनरागमन केले आहे. पुनर्वसन प्रक्रियेत सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना पुन्हा समाजाशी जोडणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.
या आव्हानाचे संधीत रूपांतर करत गडचिरोली पोलीस प्रशासन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या संयुक्त पुढाकारातून शेकडो पुनर्वसन झालेल्या नागरिकांना लॉयड्स मेटल्समध्ये कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या उपक्रमांतर्गत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, लॉयड्स मेटल्स आणि पोलीस प्रशासन आता एकत्र येऊन विकासाचा नवा अध्याय सुरू करत आहेत.
मुख्य प्रवाहात परतलेल्या या नागरिकांच्या सहकार्याने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ गडचिरोलीतील विविध गावांमध्ये विशेष शेती आणि सिंचन प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पांद्वारे सेंद्रिय शेती, बहुपीक पद्धती आणि सौरऊर्जेवर आधारित सिंचन यांसह आधुनिक आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या उपक्रमाला लॉयड्स मेटल्स आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा दिला जाणार असून, या माध्यमातून प्रदेशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘गडचिरोली फर्स्ट’ आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा पर्यायी आदर्श
लॉयड्स मेटल्सने हाती घेतलेला हा उपक्रम केवळ आर्थिक प्रकल्पापुरता मर्यादित नाही. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रभाकरन यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम ‘पर्यायी कॉर्पोरेट मॉडेल’चे उत्कृष्ट उदाहरण म्हणून पुढे आला आहे.
‘गडचिरोली फर्स्ट’ हा दृष्टिकोन स्वीकारत कंपनी विविध क्षेत्रांमध्ये स्थानिक विकासाला प्राधान्य देत आहे. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या अधिक चांगल्या संधी निर्माण करण्यासाठी स्किल अकादमीची स्थापना करण्यात येत असून, त्याद्वारे हजारो नागरिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
देशातील खाण क्षेत्रात एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि आदिवासी समाजातील सदस्यांना सहभागी करून घेणारी लॉयड्स ही देशातील पहिली कंपनी आहे आणि कंपनी या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.
विकासाचा नवा रोडमॅप
गडचिरोली पोलीस प्रशासन, आयजी श्री. संदीप पाटील, एसपी श्री. एम. रमेश आणि लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण उपक्रम पुढे नेण्यात येत आहे.
श्री. प्रभाकरन आणि आयजी श्री. संदीप पाटील यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’सोबतच्या या सहकार्याचे स्वागत केले असून, संस्थेसोबत मिळून गडचिरोलीच्या सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक विकासासाठी ठोस रोडमॅप तयार केला आहे.
या पुनर्वसन झालेल्या नागरिकांचा हा प्रवास केवळ एक दौरा नसून, गडचिरोलीच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसह आध्यात्मिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा आहे. प्रशासन, कॉर्पोरेट क्षेत्र, पुनर्वसन झालेले नक्षलवादी कॅडर आणि आध्यात्मिक नेतृत्व गडचिरोलीच्या विकासासाठी एका समान व्यासपीठावर एकत्र येत असल्याने हा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरला आहे.
