राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यासाठी ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडली गावातून ओबीसींची जनगणना करावी यासाठी जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबतच ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात यासंदर्भात २२ जानेवारीला राजपत्र जारी केले, १ मे पासून स्व घर गणना सुरुवात झाली आहे.
जनगणनेसंबंधी ३३ प्रश्नावली सूची जाहीर करण्यात आली आहे. बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख करतानाच इतरांसाठी अन्य शब्दाचा वापर करण्यात आला. मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख टाळण्यात आल्याने जातनिहाय जनगणनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. देशाच्या विकासात कुणाचे किती योगदान आहे हे जाणून घेण्यासाठी कुणाची संख्या किती आहे ते समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गावागावात जनजागृती अभियान सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

