
मुंबई: महायुतीमध्ये सगळं काही आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू असतात. तर, दुसरीकडे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतही विरोधकांकडून वारंवार आक्षेप घेतले जात आहेत. अशातच आता मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारमध्ये आपणच बॉस असल्याचा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासाठी एक निर्णय कारणीभूत ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्याचे नियंत्रण फडणवीसांनी आपल्याकडे घेतलं आहे.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी वाटप केला जात आहे. मात्र या निधीवाटपामध्ये गरज, प्रस्ताव सादरीकरण आणि सुसंगततेची तपासणी न करता अनेक पालिकांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीवाटपावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
