मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे – रवींद्र चव्हाण

जळगाव, दि. २७ प्रतिनिधी-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकीट मिळावे म्हणून अनेक स्थानिक नेते आपल्या सोईच्या पक्षात उडी मारताना दिसत आहेत. महायुतीत तर याच पक्षांतरामुळे मोठा बेबनाव झाला आहे. आमच्या पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना भाजपांत प्रवेश दिला जात आहे, अशी तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. असे असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे.

या सर्व आरोप- प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत लवकरच काहीतरी घडणार का? असा सवाल विचारला जात आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज जळगावच्या दौऱ्यावर होते. जळगावमध्ये ते महायुतीच्या उमेदवारांचा जोमात प्रचार करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठे सूचक विधान केले आहे. मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन, असे थेट आणि मोठे विधान रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. निलेश राणे जे आरोप करत आहेत, त्यावर तुमचे काय मत आहे, असे विचारल्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत, असे थेट स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे.

निलेश राणे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळले आहे. परंतु त्यांनी बोलताना मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे सांगितल्यामुळे २ डिसेंबरनंतर नेमके काय होणार? महायुतीतील पडद्यामागे काही हालचाली होत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *