कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रननी पराभव झाला, त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्येही टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, त्यामुळे शुभमन गिलची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला पोहोचणार का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडिया सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने या सत्रात आतापर्यंत 8 मॅच खेळल्या आहेत, ज्यात त्यांनी 4 मॅच जिंकल्या असून 3 मॅच गमावल्या तर एक सामना ड्रॉ झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या सत्रात टीम इंडियाचे आता 10 सामने शिल्लक आहेत.
टीम इंडिया फायनलला पोहोचणार का?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या प्रत्येक सामन्यात टीमला विजयांमुळे 12 पॉईंट्स, मॅच ड्रॉ झाल्यास 6 पॉईंट्स आणि पराभव झाल्यास शून्य पॉईंट मिळतात. भारताने आतापर्यंत 8 टेस्ट खेळल्या आहेत, ज्यात 4 विजयांसह भारताने 52 पॉईंट्स मिळवले आहेत, त्यामुळे त्यांची विजयी टक्केवारी 54.17 टक्के एवढी आहे. मागच्या WTC सत्रांवर नजर टाकली तर फायनलला पोहोचण्यासाठी टीमला 64 ते 68 टक्क्यांची विजयी टक्केवारी पुरेशी ठरते. फायनलच्या दोन टीमपर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय टीमला या विजयी टक्केवारीपर्यंत पोहोचावे लागेल.
