झरपट नदीवरील पूल यंदाच्या अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर या भागातील रस्तेसंपर्क झालाय खंडित
चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या तुटलेल्या पुलाबाबत काँग्रेसने आज मनपा मुख्यालयापुढे धरणे आंदोलन केले. शहरातील झरपट नदीवरील हा पूल यंदाच्या अतिवृष्टीत वाहून गेल्यानंतर या भागातील रस्तेसंपर्क खंडित झालाय. शहराचे भूषण असलेली महाकाली देवीची चैत्र यात्रा एप्रिल महिन्यात असते. या यात्रा काळात हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
शहरातील दुसरे रेल्वे स्थानक असलेल्या चांदा फोर्ट स्थानकाला जोडणा-या या पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपये निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्यावरही पूल निर्मितीस टाळाटाळ होत आहे. खनिज विकास निधी मधून हा पूल तातडीने पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक काँग्रेस पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी दिला आहे.
