आ. विजय वडेट्टीवार यांनी केला गंभीर आरोप, मोर्चा तयारी सुरू झाल्यापासून आपल्याला रोज 10-20 शिवीगाळीचे फोन येत असल्याचा केला आरोप, आपण मराठा समाज अथवा जरांगे यांच्या विरोधात नसून आम्हालाही ओबीसीच्या 374 जातींसाठी लढण्याचा अधिकार असल्याचे केले स्पष्ट, झुंडशाही-गुंडशाही- दादागिरी करू नका असे केले आवाहन
ओबीसी मोर्चाची तयारी सुरू केल्यापासून मला रोज 15 ते 20 आई-बहिणीच्या शिव्या देणारे फोन येत असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री आणि काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. चंद्रपूर शहरातील जोडदेऊळ येथे 10 ऑक्टोबरला नागपुरात होणाऱ्या ओबीसी महामोर्चाची पूर्व तयारी म्हणून आयोजित केलेल्या आढावा बैठक मध्ये बोलताना विजय वडेट्टीवार यांनी खळबळ जनक माहिती सांगितली.
शिव्या घालून आमची लढाई थांबू शकत नाही आणि संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार देखील हे रोखू शकत नाही असं म्हणत कितीही फोन आले तरी मी ओबीसींसाठी लढणारच असा ठाम निर्धार विजय वडेट्टीवार यांनी केला. याच आढावा बैठकीत बोलताना वडेट्टीवार यांनी जो ओबीसींच्या हक्कांचा बोलतो तो कधीही मुख्यमंत्री होत नाही, त्याला मंत्रिमंडळात चांगलं खाते मिळत नाही, राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केला जातो असेही त्यांनी जोरकसपणे सांगितले.
