जिल्हाधिकारी धान रोवणीच्या बांधावर

महिला शेतक-यांसोबत संवाद ; जाणून घेतल्या समस्या
चंद्रपूर, दि. 05 : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा आहे. सध्या धानपट्ट्यात रोवणीच्या कामाने वेग घेतला असून शेतकरी महिलांसोबत संवाद साधण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत मंगळवारी थेट तळोधी (बा.) येथील धानाच्या बांधावर पोहचल्या. धान रोवणीमध्ये व्यस्त असलेल्या महिला शेतक-यांसोबत त्यांनी मनमोकळा संवाद साधला. चिखलात उभ्या राहून मेहनत करणाऱ्या महिलांच्या अडचणी, शेतीसंबंधी समस्या आणि अपेक्षा जिल्हाधिका-यांनी ऐकून घेतल्या.
पावसाचे स्वरूप, शेतीसाठी आवश्यक सुविधा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी महिलांशी चर्चा केली. तसेच शेतक-यांच्या समस्यांकडे अधिका-यांनी संवेदनशीलतेने पाहून तातडीने कार्यवाही करावी. प्रत्यक्ष शेतात जाऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
तत्पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी तळोधी (बा.) येथील शासकीय धान्य गोदामाची पाहणी करून ऑनलाइन धान्य वितरण व्यवस्थेची तपासणी केली. तसेच कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. नगर पंचायतीतील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांना त्याचा होणारा लाभ याबाबत कृषी विभाग, नगर परिषद आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. अपर तहसील कार्यालयात महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेताना नागरिकांना शासकीय सेवा विहित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
या दौऱ्यावेळी तळोधीचे तहसीलदार शेखर पुनसे, अविनाश शेमबटवाड, प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी श्री. चांदेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *