जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण; आ.मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दिला संदेश
बोरिंग, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रस्त्यावरील नालीसाठी आमदार निधीतून मदतीची आ.मुनगंटीवार यांची घोषणा
चंद्रपूर- शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व घडविण्याचे पवित्र केंद्र आहे. गोंडसावरीच्या नूतन शाळा इमारतीतून गावाचे नाव उज्ज्वल करणारी, समाजाला दिशा देणारी आणि देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणारी विद्यार्थ्यांची नवी पिढी घडेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोंडसावरी येथील नूतन शाळा इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी गटविकास अधिकारी संगीता भांगरे, कार्यकारी अभियंता (जि.प.) प्रदीप बाराहाते, उपविभागीय अभियंता प्रकाश कारेगौडा, गटशिक्षणाधिकारी संदीप यादव, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, प्रशासक मीनाक्षी बनसोड, भाजपा नेते रामपाल सिंग, गौतम निमगडे, अशोक आलाम, बंडू पिंपळशेंडे, चंद्रकांत धोडरे, वासुदेव गावंडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. लोणबले यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नूतन शाळा इमारतीचे लोकार्पण करून त्यांनी शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, या देखण्या आणि सुसज्ज शाळा इमारतीतून गावाचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी घडावेत. इमारत जितकी सुंदर आहे, तितकेच मनाने सुंदर, संस्कारसंपन्न आणि कर्तृत्ववान विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडावेत, हीच अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी आणि आपल्या कर्तृत्वाने गोंडसावरीचे नाव देशभरात उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
स्वागतगीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचे आ.मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि कला विकसित करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमांचे अभिनंदन करत शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.एखाद्या शाळेचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली की मनाला विशेष आनंद होतो. कारण शाळा ही संस्कारांची पवित्र भूमी आहे. आजच्या काळात संस्कार देणारी केंद्रे कमी होत असून कु-संस्कारांची साधने वाढत आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आला आहे; मात्र मोबाईलवर काय पाहायचे आणि मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कसा करायचा, हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे आ.मुनगंटीवार म्हणाले.
साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या साहित्यकृतीचा उल्लेख करत त्यांनी आई-वडिलांचा आदर, चारित्र्य आणि संस्कार यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. “या शाळेतून केवळ शिक्षणच नव्हे, तर उत्तम संस्कारही मिळाले पाहिजेत,” असे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.जिल्हा परिषद शाळांबाबत समाजात असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन करत आ.मुनगंटीवार म्हणाले, जिल्हा परिषद शाळेत शिकल्यामुळे विद्यार्थी मागे पडत नाही आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकल्यामुळेच यश मिळते, हा समज चुकीचा आहे. यश हे शाळेवर नव्हे, तर विद्यार्थ्याच्या अभ्यास, शिस्त, परिश्रम आणि जिद्दीवर अवलंबून असते, असे त्यांनी नमूद केले.
भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांचा तसेच संत गाडगेबाबांच्या “मुलांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू देऊ नका” या संदेशाचा उल्लेख करत त्यांनी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शासनाच्या माध्यमातून मतदारसंघातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी सांगितले.
गोंडसावरी गावासाठी तीन महत्त्वपूर्ण घोषणा आ.मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसाठी आमदार निधीतून बोरिंग उपलब्ध करून देण्यात येईल, गावातील वस्तीमध्ये रस्त्यालगत नालीचे बांधकाम करण्यासाठी निधी दिला जाईल आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
“गोंडसावरीतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती किंवा ग्रामस्थ शिक्षणाच्या उन्नतीसाठी जेव्हा जेव्हा मला हाक देतील, तेव्हा तेव्हा मी संपूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले.विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद देताना ते म्हणाले, “मोठी स्वप्ने पाहा, ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर जीवनात उंच भरारी घ्या. यशस्वी, यशवंत आणि कीर्तीवंत नागरिक बनून आपल्या गावाचे, जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा,” अशा मनःपूर्वक शुभेच्छा आ. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
