देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जनगणना २०२६-२७ च्या राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या तब्बल १७ शिक्षकांविरुद्ध चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करून प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यामुळे दोघांवर, तर काल १५ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यामुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत २०२६-२७ ची जनगणना प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध विभागांतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
मात्र, संबंधित १७ कर्मचाऱ्यांनी ही नियुक्ती पत्रे स्वीकारण्यास टाळाटाळ केली आणि प्रशिक्षणाच्या सत्रांकडेही पाठ फिरवली. वारंवार सूचना देऊनही कामकाजात अक्षमता दाखवणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरुद्ध अखेर चंद्रपूर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे यांच्या आदेशानुसार तक्रार दाखल करण्यात आली. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

