एमबीबीएस प्रवेशाला निघण्याच्या दिवशी संपविले जीवन
नीट परीक्षेत यश मिळविल्यानंतरही डॉक्टर व्हायचे नसल्याने १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली. अनुराग अनिल बोरकर असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले.
मृतक अनुराग बोरकर याने नीट यूजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक पटकाविली होती. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले. त्याला आज एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतू राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती दिली आहे.
