स्वातंत्र्यासोबत कर्तव्याची जाणीव जपणे काळाची गरज – मा. आमदार श्री. किशोर जोरगेवार

‘हर घर तिरंगा’ बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात; रंगीबेरंगी फुगे सोडून उपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर १३ ऑगस्ट – स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागामुळेच आज आपण लोकशाहीचा अनुभव घेत आहोत. लोकशाही ही राज्यकारभाराची सर्वात प्रभावी पद्धत असून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर हक्कांसोबतच कर्तव्यांची आणि जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मा. आमदार श्री.किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मा. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आकाशात तिरंगी फुगे सोडून उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

मा. आमदार श्री.किशोर जोरगेवार –
उपस्थितांना संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले, “आपण सर्वांनी आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असले पाहिजे, पण त्यासोबतच राष्ट्रप्रती असणाऱ्या कर्तव्यांचे भान ठेवणे तितकेच गरजेचे आहे. समाजात स्वातंत्र्याच्या कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष उपक्रम राबवून पुढे आले पाहिजे. तसे झाल्यासच संघर्षाने मिळालेल्या या स्वातंत्र्याचा खरा उपयोग होईल.”

मा. महापौर सौ.संगीता खांडेकर –
यावेळी बोलताना मा. महापौर संगीता खांडेकर यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देत नागरिकांना देशप्रेमाचा संदेश दिला. “असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. चंद्रपूर शहर नेहमीच राष्ट्रभक्तीच्या आणि ऐतिहासिक उपक्रमांमध्ये आघाडीवर राहिले आहे. ‘हर घर तिरंगा’ हा केवळ एक उपक्रम नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रध्वजाविषयीचा आदर आणि स्वाभिमान द्विगुणीत करणारा उत्सव आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.

मा. आयुक्त श्री.अकुनूरी नरेश –
कार्यक्रम प्रसंगी मा. आयुक्त अकुनूरी नरेश यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी प्रास्ताविक केले. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रत्येक घराघरात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणे हा असून, महापालिकेतर्फे नागरिकांसाठी तिरंगा उपलब्ध करून देणे तसेच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

या बाईक रॅलीमध्ये शहरातील नागरिक, तरुण, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण रॅलीदरम्यान “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी उपमहापौर श्री. प्रशांत दानव,स्थायी समिती सभापती सौ.मनस्वी गिऱ्हे,गट नेता श्री. सुरेंद्र अडबाले,झोन १ सभापती श्री. रवी लोणकर, गट नेता श्री. सुरेंद्र अडबाले, स्थायी समिती सदस्य सुभाष श्री.कासनगोट्टूवार,सौ.श्रुती घटे,सौ.श्वेता तोतडे,सौ.वैशाली महाडोळे, उपायुक्त श्री.संदीप चिद्रावार, उपायुक्त श्री.शेषराव टाले,शहर अभियंता श्री.रवींद्र हजारे,मुख्य लेक्षापरीक्षक श्री.मनोज गोस्वामी,सहायक आयुक्त श्री.अनिलकुमार घुले,नगर सचिव श्री.संतोष गर्गेलवार,मनपा अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *