वीजपुरवठा खंडित झाला तरी उपचार सुरूच; उमरी पोतदार आरोग्य केंद्राला सौरऊर्जेचा आधार
रुग्णसेवेत खंड नको, सौरऊर्जेतून आरोग्यसेवेला नवी ऊर्जा; पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ ऊर्जा संकल्पनेला बळ
चंद्रपूर : ग्रामीण भागातील रुग्णांना वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उपचारात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा अखंडित सुरू राहाव्यात आणि आरोग्य केंद्रातील अत्यावश्यक उपकरणे सतत कार्यरत राहावीत, या संवेदनशील भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उमरी पोतदार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५ किलोवॅट क्षमतेची ऑफ-ग्रिड सोलर पॅनल प्रणाली उभारण्याचा पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामासाठी निधी मंजूर केला असून, परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि अखंड आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.
रुग्णालयात वेळेत उपचार मिळावे हीच भावना लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा विषय प्राधान्याने मांडला. सौरऊर्जा प्रणालीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही आवश्यक वैद्यकीय उपकरणे, प्रकाश व्यवस्था आणि मूलभूत आरोग्य सेवा अखंडित सुरू राहणार असून, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय टळणार आहे.
देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभर स्वच्छ ऊर्जा, हरित विकास आणि आत्मनिर्भर भारताचा दिलेला मंत्र आता ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतही प्रत्यक्ष साकार होत आहे. सौरऊर्जेच्या माध्यमातून आरोग्य सेवेला सक्षम करण्याचा हा निर्णय पर्यावरणपूरक तर आहेच, शिवाय ग्रामीण नागरिकांना अधिक विश्वासार्ह आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. रुग्णकेंद्रित विकासाचा ध्यास घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या पुढाकारामुळे उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा अधिक सक्षम, सुरक्षित आणि अखंडित होणार असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

