सोनापूर येथे महर्षी वाल्मीक ऋषी प्राणप्रतिष्ठा सोहळा
महर्षी वाल्मीकिंनी आपल्या लेखनातून रामायण रचले. आणि त्या बहुमूल्य विचारांमधून संपूर्ण समाजाला प्रभु रामचंद्र यांच्या महानतेची महती देत मानवतावादी मूल्यांची दिशा दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजात समता, बंधुता आणि नैतिकतेची जाणीव निर्माण झाली, असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली तालुक्यातील सोनापूर येथे महर्षी वाल्मीक समाज मंडळ सोनापूर यांच्या वतीने आयोजित महर्षी वाल्मीक मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्या प्रसंगी बोलत होते.
यावेळी मंचावर वाल्मीक समाज अध्यक्ष कृष्णा राऊत, तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहणे, प्रशांत चिटणूरवार, माजी सभापती राकेश गड्डमवार, निखिल सुरमवार, सरपंच जयश्री मडावी, डॉ. अविनाश धुडसे, रुपेश किरमे, पांडुरंग कोसरे, मूर्तिकार सुरेश मडावी, तथा वाल्मीक समाज नेते, पदाधिकारी तसेच विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महर्षी वाल्मीक यांनी रचलेले रामायण हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून जीवनमूल्यांचा महान संदेश देणारे साहित्य आहे. त्यांनी समाजातील वंचित, दुर्बल घटकांना आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांमुळे समाजात मानवतेची आणि सदाचाराची पायाभरणी झाली.
मी मंत्री असताना वाल्मीक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना नव्याने कार्यान्वित केली. यामध्ये सर्वाधिक 8700 घरकुल ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात मंजूर झाले. तर सावली तालुक्यात 2 हजाराहून अधिक घरकुले बांधण्यात आले आहे. अत्यंत प्रामाणिक व कष्टाळू भोई समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असेही ते यावेळी म्हणाले. तर समाजाला लागलेले भोदूगिरीचे व अंधश्रद्धेचे ग्रहण यात गुरफटून न जाता समाजाला शिक्षित करून विकासाच्या उच्चस्थानी नेण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे असे आवाहन देखील विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करत महर्षी वाल्मीक ऋषींच्या महान कार्याची महती उपस्थितांना दिली. यावेळी मोठ्यासंखेने समाजबांधव उपस्थित होते.
