इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

चंद्रपूर, दि. 8 : चंद्रपूर शहराला समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याची कामे सध्या वेगाने सुरू असून, या कामांची जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.

इरई नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला २८ मार्च २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या टप्प्यात आतापर्यंत चोराळा पुलापासून माना टेकडीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी विठ्ठल मंदिर प्रभागातील श्री वैभवलक्ष्मी माता मंदिर परिसर, इरई-झरपट नदी संगम तसेच हडस्ती पुलाजवळील कामांची तपासणी केली.

यावेळी त्यांनी नदीपात्रातून काढण्यात येणारा गाळ नदीकाठावर न ठेवता निश्चित डम्पिंग स्थळी साठविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच गाळ काढण्याची प्रक्रिया, वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कामाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली. नदीपात्रातून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी तहसीलदारांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पाहणीवेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, तहसीलदार विजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार , शहर अभियंता रवींद्र हजारे, सीटीपीएसचे अभियंता श्री. हजारे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जलेश सिंग, उपअभियंता श्री. सय्यद, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सलीम शेख, उपअभियंता रवींद्र कळंबे, उपअभियंता आशिष भारती तसेच कंत्राटदार जुनेजा उपस्थित होते.

इरई नदीचे वहनक्षमता वाढविणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि नदीचे पुनरुज्जीवन करणे या उद्देशाने ही गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर काम अधिक गतीने व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *